Thursday 14 March 2024

आठवणींचं कडबोळं

  

पिंजर लावायला म्हणून आरशासमोर उभी राहिले. अनामिकेने पिंजर लावत असताना मनगटाखाली भाजल्याच्या चंद्रकोरी उमटलेल्या दिसल्या आणि आठवलं लेक घरी जेवायला घरी आली होती. तिच्या घरच्या बाईच्या हाताच्या चवीचा कंटाळा आल्यानं तिला आईच्या हातची अंबाडीची भाजी नि भाकरी खायची होती. भाकरी करताना खोलगट तव्यावर भाकरी टाकून झाल्यावर पाणी फिरवताना अनेकदा मनगटाखाली चटके बसले होते.

पूजा करताना किंवा एखाद दिवशी जास्तीची कामं करताना या भाजक्या चंद्र्कोरी बघितल्या की मला आजीची आठवण होतेच होते. तिच्या बांगडी भरल्या हातावर कायम या काळसर चॉकलेटी भाजक्या चंद्रकोरी असत. आजीच्या कामाविषयी आई अनेकवेळा भरभरून बोलते. दिवसाला दररोज ४०-५० भाकरी चुलीवर भाजाव्या लागत. आणि सगळा स्वयंपाकही असायचाच. तशात ती जर गरोदर असली तर मग ते चुलीपाशी अवघडून बसणं, तिने पाय पसरले की पोटातल्या जीवालाही जरा पाय पसरायला मिळे. इतक्या भाकरी भाजून, बाकीचा स्वयंपाक करून तिची अन्नावरची वासना जात असे. तिची वासना गेली असली तरी पोटातल्या जीवाचं काय? मग अशा वेळेस ती चार पाच लसणीच्या पाकळ्या ठेचून घेत असे. कोनाड्यात एका टोपलीत वाळक्या मिरच्या असत त्यातल्या दोन मिरच्या घेत असे. आणि भाकरी झाल्यावर त्याच खोलगट तव्यावर चमचाभर तेल घालून ठेचलेली लसूण, मिरची घालत असे. त्यातच  भाकरीवर पाणी फिरवायला जे भांड घेतो त्यात जे पीठ जमा होई ते पिठाच्याच बोटांनी ढवळून तव्यावरच्या फोडणीत घालत असे. नुसत्या लसूण, मिरचीच्या वासानेही पोटातला जीव आनंदाने उड्या मारतो असं तिला वाटत असे. खरी गोष्ट अशी होती की तिला भूक लागलेलीच समजत नसे. एका वाफेत ती ज्वारीच्या पिठाची उकड शिजत असे. तिथे जवळच असलेल्या ताटलीत ती सगळी उकड काढायची त्याला मधोमध एक विहीर करून त्यात कच्चं तेल घालून सावकाशपणे बोटाने चाटत खायची. वर ताक प्यायचं. झालं एका गर्भारशी बाईचं जेवण.

याशिवाय शेतातून आलेला भुईमूग असो, चिंच असो की तूर असो. एकादशीच्या आधी दाण्याचं कूट संपलं असलं तर भुईमुगाच्या शेंगा त्यांची नाकं ठेचून त्यातले दाणे काढायचे. चिंच आलेली गावात लोकांना कशी कळायची कोण जाणे. रोज चार/ पाच जणं तरी चिंचेबद्दल विचारायला येतच. मग जरा सवड मिळाली की खल उपडा घालून त्यावर लाकडी दांडक्याने चिंचेवर घाव घालून चिंचोके आणि शिरा/ रेषा वेगळे काढून चिंच फोडून ठेवायची. आई, मी , मावश्या सुट्टीत गेलो की आम्ही मदत करत असूच. पण तिच्या कष्टांना पारावर नव्हता.

आज मिक्सर , फूड प्रोसेसर वापरताना आजीचे हात आठवतात. आपल्या वाळक्या , शुष्क तरीही तळव्याला मऊ असलेले हात आठवतात. गॅस गिझरचं पाणी अंगावर घेताना, बंबातलं कढत कढत पाणी घंगाळातून अंगावर घेताना पाण्याला येणारा एक वेगळा वास अजूनही नाकात जाणवतो.

माझ्या एका मित्राने एके ठिकाणी लिहिलं होतं की वारसा नावाची एक नितांतसुंदर चीज असते आपल्या आयुष्यात. हा वारसा काय असतो? तर आपल्या आई वडलांकडून आलेल्या गुण दोषांचा, लहानपणी ऐकलेल्या गोष्टींचा, गाण्याचा, वाचलेल्या पुस्तकांचा, आलेल्या अनुभवांचा हा वारसा आपल्याला भूतकाळात घट्ट पाय रोवून उभं रहायला शिकवतो. आपल्या पुढच्या आयुष्य या वारशाची एक घट्ट विणीची गोधडी तयार  तयार होते. ही गोधडी आपल्यावर कायम पांघरलेली असते.

एक दिवस दुपारी घरी असताना ओळखीची बेल वाजली. बघते तर आई दारात उभी होती. आई घरात आली. तिने माझ्या हातात आठ रुपये दिले आणि म्हणाली हे आठ रुपये मीनूच्या पिगी बँकेत टाक. रिक्षाने येणार म्हणून हातात ठेवले पण रिक्षाच मिळाली नाही. घोटभर पाणी पिऊन आई म्हणाली मी जरा आडवी पडते गं. दमलेय उन्हातून. आई एखाद्या लहान मुलासारखी कुशीवर झोपली होती. लहान मूल अत्यंत विश्वासाने आपल्या आईजवळ झोपतं तशीच ती झोपलेल्या मिनू जवळ आडवी झाली. चेहरा दमलेला होता. बाबा गेल्यापासून आई आपल्या खाण्या पिण्यावर लक्ष देत नाही असं एकदम जाणवून पोटात खड्डा पडला. मुलगी म्हणून मला यात दुर्लक्ष करून चालणार नाही. एकदम अपराधी वाटलं. तासाभराने आई आणि तिची नात दोघीही उठल्या. झोप पुरी झाल्यामुळे असेल पण दोघी ताज्यातवान्या दिसत होत्या. आई टेबला जवळ येऊन बसली. मी पोळ्या करत होते. मला वाटलं की आई आता पोळपाट लाटण्याचा ताबा घेते की काय..पण तसं काही झालं नाही. म्हणाली भूक लागली आहे. दोन दिवस नीट खाल्लंच नाही. बरं वाटत नव्हतं. शेवटी आज वाटलं आता तुझ्याकडे आजचा दिवस राहावं. आराम करावा. मला पोटात प्रचंड तुटलं. म्हणाले अगं तरीच फोनवर तुझा आवाज ओढलेला वाटला. ती नुसतीच हो म्हणाली.

मी एका छोट्या ताटलीत गरम पोळी तेलाचं बोट लावून वाढली. एका छोट्या वाटीत काल रात्री केलेला सुधारस वाढला. कडेला तूप वाढलं आणि आईसमोर ताटली ठेवली. आईनं कुठलासा श्लोक म्हणून जेवायला सुरवात केली. पहिला घास खाल्यावर लगेच म्हणाली छान खमंग झालीये पोळी. सुधारसा सोबत मस्तच लागतीये. घरातल्या बाईला अशी आपण केलेल्या पदार्थांची पावती किती लोकं पहिला घास खाल्ल्या खाल्ल्या देत असतील माहित नाही. देत असतील तर छानच. पण देत नसाल तर द्याच. मग पुढे काय जादू होते ते अनुभवा. जेवण झाल्यावर अन्नदाता सुखी भव म्हणत उठली. म्हणाली आज पोटात गोविंद गोविंद वाटतंय. मला तर माझंच पोट भरल्या सारखं वाटत होतं. जी आपली आई मी संध्याकाळी शाळेतून घरी आल्यावर चहा बरोबर गरम गरम पोळी करून देत असे तिला आज आपण गरम गरम पोळी करून वाढली याचं कोण समाधान वाटलं. सगळं आटपून आत गेले तर आईचा परत डोळा लागलेला. आणि तिची नात तिला डोक्यावर, कपाळावर जो..जो..असं म्हणत थोपटत होती. मित्र म्हणतो ती वारशाची वीण हीच.

एके दिवशीची गोष्ट. कामं अगदी पाठीला पाठ लावल्यासारखी आली होती. साय तळाला गेली होती. ती सायीच्या भांड्यात काढायची होती. कणिक भिजवायची होती. मुलगी शाळेतून यायच्या आधी तिच्या आवडीचा कोथिंबीरीचा पराठा करायचा होता. साय काढून दुधाच्याच भांड्यात कणिक काढली. दुधातल्या सायीमुळे भांड्याला एक प्रकारचा ओशटपणा येतो. आपण जर दुधाच्या भांड्यात कणिक भिजवली तर तो सगळा ओशटपणा कणकेत मिसळून दुधाचं भांडं एकदम स्वच्छ होतं. आणि इतर भांड्यांना तो ओशटपणा लागत नाही. हा वारसा पणजी, आजी आणि आईकडून माझ्याकडे आलेला.

तुपाच्या बेरीचीही तीच गोष्ट. तूप कढवून दोन दिवस झाले होते. तुपाची बेरी काढून ती फ्रीज मध्ये ठेवली होती. एक दिवस सकाळी सकाळी चुलत सासरे आले. नाश्त्याला एक खमंग थालीपीठ दिलं. नको नको म्हणत अगदी आवडीनं खाल्लं. थालीपिठाचा समाचार घेऊन झाल्यावर त्यांनी हे कसलं थालीपीठ आहे विचारलं. म्हणाले बेरीचं. बेरीत ज्वारी आणि तांदुळाचं पीठ घातलं. दोन कांदे, भरपूर कोथिंबीर घातली. तिखट मीठ घालून ते एकत्र करून त्याची ही थालीपीठं केली. बेरी आणि त्यातला तुपाचा अंश दोन्ही वाया न जाता उपयोगाला आले. हा चवींचा आणि निगुतीचा वारसा.

आपलं घर, आपल्या घराच्या चार भिंती त्यांचे कोपरे, थोडक्यात आपली वास्तू कायम आनंदी रहायला हवी असेल तर आपलं घर स्वच्छ ठेवणं आवश्यक आहे. जुनं, नको असलेलं समान, कागद पत्र वेळ मिळेल तेव्हा फाडून टाकावं. मला असं केल्यावर माझं घर मोकळा श्वास घेतंय असं वाटतं. सुट्टीत आजोळी दिवाळीत एकदा पहाटे पहाटे उठले आणि चहा प्यायला स्वयंपाकघरात गेले. तिथे पेट्रोमॅक्सच्या दिव्याच्या  उजेडात आजी चहाची तयारी करत होती. चुलीवर नजर गेली आणि बघते तर आदल्या दिवशी रात्री भाकरी करत असताना पिठमय झालेल्या चुलीचा मागमूस नव्हता. आम्ही मुलं जेवून वरच्या माडीत गेलो. पण आजीने सगळ्यांची जेवणं झाल्यावर चुलीतले निखारे काढून, चूल शेणाने सारवून त्यावर रांगोळी काढली होती. हळद कुंकवाची बोटंही दिसत होती त्या पेट्रोमॅक्सच्या दिव्यात.

मला मी जेव्हा माझी गॅसच शेगडी स्वच्छ पुसते तेव्हा ती सारवलेली चूल नेहमी डोळ्यासमोर येते. आपला स्वयंपाकघराचा ओटा, ओट्या खालचे ड्रॉवर, सिंक, सिंक खालची जागा हे महिन्यातून एकदा. खरं तर दोनदा सगळी भांडी, चमचे, कप, बाहेर काढून स्वच्छ करावेत. कोपऱ्यातून आणि कडेने दोन तीन लवंगा ठेचून आणि मिरी ठेवाव्यात. त्यावासाने झुरळांची, मुंग्यांची तिथपर्यंत यायचं नाही याची लक्ष्मणरेषा ठरून जाते. सिंकच्या खाली कचऱ्याचा डबा असेल आणि ओल असेल तर हमखास झुरळं, गोम, घोण यांची छुपी वस्ती असतेच असते. वर्षातून तीनवेळा हर्बल पेस्ट कंट्रोल करून घ्यावं. स्वयंपाकघर हे आपल्या संपूर्ण वास्तूचं हृदय असतं. ते जर ठणठणीत असेल तर घरातल्या सगळ्यांची प्रकृती उत्तम राहील यात शंकाच नाही.

पाणी हे जीवन आहे हे आपण लहानपणी शिकलोच आहोत. आज बातम्यांमधून, सोशल मिडिया वरून आपण गावात पडलेला दुष्काळ बघू शकतो. शहरात त्याची इतकी झळ बसत नसली तरी पाण्याचा वापर हा आपल्या कडे असलेल्या मौल्यवान गोष्टीसारखा केला पाहिजे. दिवसेंदिवस पाण्याचा नैसर्गिक स्रोत कमी होतोय. पावसावर आपले पुढचे काही महिने अवलंबून असतात. पालेभाज्या धुतलेलं पाणी आपण आपल्या घरगुती बागेत वापरू शकतो. नळाची धार कमीच ठेवावी. दात घासत असताना असताना अनेकजण नळ सुरु ठेवून दात घासत असतात. एक दिवस ते पाणी मोजून बघा किती वाया जातं ते. कुकर लावला असेल तर तळाला असलेलं गरम पाणी ओशट, तुपकट भाडी धुण्यासाठी किंवा मिक्सरचं भांडं धुण्यासाठी करू शकता. इंधन आणि पाणी दोन्ही वाचेल.

 दिवसातून एकदा आपल्या घरातल्या प्रत्येक खोलीच्या कोपऱ्यातून एक मायेची नजर फिरवा. त्यावेळी चांगले विचार मनात आणा. वास्तू तर काय तथास्तु..तथास्तु म्हणतच असते.

गजरा

 आता अजून एक मुलींच्या, बायकांच्या आवडीची गोष्ट सांगते. एका लग्नाला मुहूर्ता नंतर लहान लहान मुलं , मुली स्टेजवर फुलांच्या पाकळ्या गोळा करत होती. त्या लग्नात अक्षता नावापुरत्याच टाकून नवरा नवरीच्या जवळपास उभं असणाऱ्यांना मिक्स फुलांच्या पाकळ्या दिल्या होत्या. ती मुलं पाकळ्या गोळा करून एकमेकांच्या अंगावर उधळत होती. त्यात एक मुलगी मात्र म्हणाली की, माझ्या डोक्यावर हे टाकू नका. माझा गजरा खराब होईल. मला लग्नात सगळ्यांचं निरीक्षण करायला खूप आवडतं. आपला वेळही छान जातो त्यात. नवर्याच्या मित्राच्या मुलाचं लग्न होतं. नवरा त्याच्या मित्र मंडळीत असल्यामुळे  मी एकटीच स्टेज समोरच्या खुर्चीत बसून होते. मी पण कोणे एकेकाळी केलेला लहान मुलांचा वेडेपणा एन्जोय करत होते. त्या मुलांच्यात हेयर band सारखा गजरा लावलेली एक मुलगी होती. अगदी जसा लहान मुलांना आवडतो तसाच मोगऱ्याच्या कळ्यांचा गजरा लावला होता. खेळताना मधेच गजरा जागेवर आहे का नाही ते चाचपून बघत होती. तिच्यात लहानपणीची मी बघत होते. आमच्या शाळेच्या रस्त्यावर गुलबक्षीची खूप झाडं होती. मी त्याची अनेकदा फुलं घरी आणत असे.  फुलांची देठं एकमेकात विणून माझी मावशी त्याची सुंदर गजरा करत असे. चंद्रकोरीसारखा दिसे गजरा. मावशीच्या काळ्या, लांबसडक वेणीवर हा गजरा अगदी उठून दिसायचा. मला हा गजरा खूप आवडायचा. पण माझा बॉबकट असल्यानं मला हा गजरा घालताच यायचा नाही. शेवटी गजरा घालायला मिळावा म्हणून  मी ठरवून केस वाढवायला सुरवात केली आणि शाळेजवळची रोपं जाऊन तिथे बांधकाम सुरु झालं. त्यानंतर पुढे किती तरी वर्षांनी मला अशीच झाडं कोकणात दिसली. पण मावशीसारखा गजरा काही कोणाला जमला नाही.

आमच्या वर्गातली एक मुलगी एक दिवस मोत्याचा गजरा वाटावा असा तगरीच्या कळ्यांचा देठं काढून ओवून केलेला गजरा लावून आली होती. तिच्या काळ्याभोर   केसात जणू मणीच ओवल्यासारखे दिसत होते. झालं...मलाही तसाच गजरा हवासा वाटू लागला. पण आमच्याकडे तगरीचं झाड नव्हतं. पण शेवटी माझी तगरीचा गजरा घालायची इच्छा पूर्ण झालीच. एक दिवस माझ्या वर्गातल्या मैत्रिणीनंच मला रुमालात बांधून तगरीच्या कळ्या आणून दिल्या. म्हणाली..या घे बाई कळ्या. आणि घाल करून गजरा. मला कधी एकदाची मी घरी जाते आणि गजरा करते असं झालं. मी घरी गेले. हात पाय धुऊन एका ताटलीत कळ्या ओतल्या. मी कात्रीनं कळ्यांची देठं कापायला लागले. तेवढ्यात आई शाळेतून आली. तिने हा काय प्रकार आहे विचारलं. मी सगळं सांगितल्यावर मुक्या कळ्या तोडू नयेत गं मंजिरी. झाडालाही वाईट वाटू शकतं. मला ते मनापासून पटलं. आई म्हणाली..आज असं केलंस. पण परत असं करू नकोस. कर त्याचा गजरा. आणि घाल डोक्यात. त्या दिवशी मी तो कळ्यांचा गजरा घातला खरा..पण मनातून खूप वाईट वाटत होतं.

मोगरा, मदनबाण, जाई, जुई या फुलांच्या कळ्यांचा जरी गजरा घातला तरी त्या नंतर उमलणाऱ्या असतात. मला मे महिन्यात मिळणाऱ्या मदन बाणाचा गजरा सगळ्यात आवडतो. एकदा कामाच्या ठिकाणी संध्याकाळी मी मदनबाणाचा गजरा लावला होता. एक आजोबा काही कामासाठी आले. काम झाल्यावर जाता जाता मला म्हणाले , तुमच्या गजऱ्याचा सुंदर वास येतोय. कसला गजरा आहे हा..मी माझ्या भाच्यांसाठी न्यावं म्हणतोय. मी नाव सांगितलं. दुसऱ्याच दिवशी ते परत आले. त्यांनी मला एका पानाची गुंडाळी दिली. त्यात मदनबाणाच्या उमलू पहाणार्या फुलांचा गजरा होता. या काळ्या पूर्ण उमलल्या शिवाय याचा वास येत नाही. पण एकदा का या काळ्या उमलल्या तर याच्या सुंदर वासाने सारा आसमंत सुगंधित करून टाकतो. काय सुरेख निर्मिती आहे ही सृष्टीची.

तेच गोष्ट चमेली, जाई, जुई मोगर्याची. सकाळी न्हाऊन केसांची छानशी  बट वेणी घालावी. त्यावर एखादा सुंदर, मनमोहक वासाचा गजरा घालायचा. केस जरा ओले असतील तर छानच. छान अशाकरता की ओलेत्या केसांवर या फुलांचा वास खूप वेळ टिकून रहातो. आपल्या अवती भवती असणाऱ्यांना हा मंद सुवास विशेष जाणवतो. मला उग्र वासाचा सुरंगीचा गजरा फारसा आवडत नाही. बकुळीचा वासही तसा उग्रच. पण तरीही आवडणारा. पण हल्ली बकुळीचं झाडं बघायलाही महाग झालंय. अबोलीचा गजरा मला बघायला आवडतो. अबोलीच्या फुलांचा रंग मला प्रसन्नतेचं प्रतिक वाटतो.

लहान असताना एकदा कोणत्यातरी सिनेमात एका दृश्यात एका सुंदर सजवलेल्या हॉलमध्ये एक बाई आलेल्या पाहुण्यांचं स्वागत मनगटाला गजरा बांधून करत होती. त्यानंतर मी सहजच मनगटाला गजरा बांधला. आणि आईच्या माराला सामोरी गेले. मला मी मार का खाल्ला याचा प्रश्न पुढे बरेच वर्ष पडत होता पण उत्तर मिळत नव्हतं.

एकदा एका कार्यक्रमात विद्या बाळ प्रमुख पाहुण्या होत्या. आम्ही सगळ्या जणींनी मोगर्याचा गजरा लावला होता. एक गजरा उरला होता. सहजच मी त्यांना तो दिला. सोबत पीनही दिली. त्यांनी पिन परत केली. मला वाटलं की त्या तो गजरा केसाच्या एका बटेत अडकवतील. थोड्यावेळाने बघितलं तर त्यांनी तो गजरा लहान मुलांना रुमाल लावतात तसा डाव्या बाजूला गोल करून लावला होता. मला ही गजरा लावण्याची कल्पना आवड्लीच. मी त्यांना तसं म्हणालेही. त्या म्हणाल्या की अगं इतका सुंदर वास असलेल्या गजरा आहे तर मला नको का वास यायला. आता इथे मी हा लावल्यामुळे मी त्याचा वास घेण्याचा आनंद उपभोगू शकतेय. काय बरोबर ना...त्या जे म्हणाल्या ते मला पटलं. पण तसा गजरा लावण्याचं माझं अजून तरी काही धारिष्ट्य झालेलं नाही.

 

 

बांगड्या

 

त्या दिवशी बऱ्याच वर्षांनी बांगड्यांच्या दुकानात गेले. निमित्त होतं माझ्या मुलीच्या संक्रांतसणाचं. तिला यावर्षी बांगड्या लुटायच्या होत्या. दुकान तसं छोटंसंच होतं. पण बांगड्यांचे रंग आणि प्रकार खूप होते. मला आवडतील अशा बांगड्या निवडीला वाव होता. माझ्यासाठी मी आमसुली रंगाच्या वर्खाच्या बांगड्या घेतल्या. अगदी हातात घालून सुद्धा बघितल्या.  त्या आमसुली रंगाकडे बघत माझ्या आजोळची आठवण झाली. मे महिन्यात आम्ही सगळी मावस, मामे भावंडं रहिमतपूरला जमत असू.

स्वयंपाकघरात आजी  नेहमीच चुलीपाशी बसलेली असे. आम्ही मुलं पुढ्यात ताट घेऊन अंगत पंगत करून बसायचो. सहज आठवलं. सुट्टीतल्या एके दिवशी दोन चुलींपैकी एका चुलीवर मोठ्या पोळपाटावर सांज्याची पोळी लाटत होती. लाटताना तिच्या हातातल्या काचेच्या बांगड्या मागेपुढे होत होत्या. त्यांची नाजूक किणकिण ऐकू येत होती, आजीच्या दोन्ही हातात मिळून आमसुली रंगांच्या साताठ बांगड्या होत्या.  दुसऱ्या चुलीवर भाजीसाठी तेल तापवत ठेवलं होतं. जवळच असलेल्या जमिनीतल्या उखळीत तिने दोन मिरच्या, चार लसणीच्या पाकळ्या ठेचायला टाकल्या.  त्या ठेचताना पुन्हा तोच बांगड्याचा आवाज. पण यावेळची आवाजाची लय वेगळी होती. मी वर्षानुवर्ष आजीचे हात त्याच आमसुली रंगाने भरलेले बघितले आहेत. तिला तोच रंग आवडायचा.

आजी म्हणायची, पोरी माहेरपणाला आल्या आहेत. त्यांना आवडतील त्या बांगड्या भरायला जाऊदेत. आम्ही मुली आणि आई, मावश्या शेजारीच असलेल्या कासाराकडे बांगड्या भरायला जायचो. तिथे वरपासून खालपर्यंत बांगड्यांची भिंत होती. शिवाय एकत्र गोल बांधून ठेवलेल्याही होत्याच. आईनं पण आम्सुलीच भरल्या. मला पण तशाच रंगाच्या हव्या होत्या. पण लहान मुलांच्यात तशा येत नाही म्हणून सांगितलं. तू पाकिजा पिच्चर बघितलास का तिनं विचारल्यावर मी मानेनेच नाही म्हंणलं. त्या पिच्चर मधल्यासारख्या भरते तुला. या बघ रेशमी पिवळ्या पिवळ्या. मला मुळातच बांगड्या घालायची हौस. त्यात कुठल्या तरी सिनेमात घातलेल्या नटीनं सारख्याच माझ्या बांगड्या आहेत म्हणल्यावर मला आनंदच झाला. मी एकेका हातात चांगल्या डझनभर बांगड्या भरल्या. पुढे जसा वयानुरूप हात मोठा झाला तशा माझ्या आवडत्या रंगाच्या बांगड्या मला मिळाल्या. आजी कडून आईला आणि आईकडून मला ही रंगाची आवड झिरपली होती. कणिक भिजवताना आई उजव्या हातातल्या बांगड्या जितक्या घट्ट बसवता येतील तितक्या मागे सारायची. नाहीतर बांगड्या पीठमय होतील. तरीही त्यातली सगळ्यात पुढे असलेली बांगडी यायचीच पुढे.

एकदा फोटो काढायला स्टुडियोत गेलो होतो. माझ्या हातात हिरव्या वर्खाच्या होत्या. आम्हाला आमचे हात फुली केल्यासारखे ठेवायला सांगून फोटोग्राफर फोटो काढणार तेवढ्यात मी हाताची फुली सोडून माझ्या बांगड्या मनगटापाशी आणल्या. हलू नकोस गं असं फोटोग्राफरनं म्हणल्यावर , मग बांगड्या नीट नाही ना दिसणार म्हणून पुढे केल्या असं मी त्याला म्हणाले. तो फोटो आजही बघताना हा संवाद आम्हा सगळ्यांना आठवतो.

 

आईच्या हातात कायम काचेच्या बांगड्यांमध्ये दोन बिलवर असायचे. ती पाटल्या कधीतरीच घालत असे. दिवाळीत सगळ्यात मागे पाटल्या त्यानंतर दोन काचेच्या, पुढे दोन दोन बिलवर घातलेले आईचे मौ सूत हात आम्हाला तेल लावायचे तेव्हा तिच्या बांगड्यांच्या किण किण आवाजात ब्रह्मानंदी टाळी लागायची.

मला वेगवेगळ्या बांगड्या जमवायचा छंद आहे. त्यात खास करून काचेच्या आणि लाखेच्या बांगड्या मला आवडतातच. पण आमच्या घरात जेव्हा एका बंगाली कुटुंबाशी नातं जोडलं गेलं तेव्हा मला शंखाच्या बांगड्याही आवडायला लागल्या. पण त्या बांगड्या फक्त लग्न झालेल्या बायकाच घालू शकतात असं कळलं. शुभ्र पांढऱ्या कोरीव काम केलेल्या शंखाच्या बांगड्या सगळ्यात मागे , त्याच्यापुढे लाल चुटूक बांगडी. कसलं सुंदर कॉम्बिनेशन आहे हे. शिवाय या लाल बांगडीच्या पुढे एकेक सोन्याचं कडं. तेही मा शारदा बाला डिझाईनचं. शंखाच्या बांगड्या शरीरातील उष्णता कमी करते शिवाय एकूणच बांगड्यांच्या घर्षणाने रक्ताभिसरण सुधारतं अनेकांकडून ऐकलंय आणि वाचलंय पण.

लहान असताना आम्हा मुलीना अजून एक नाद होता. आम्ही मातीतून बांगड्याचे तुकडे शोधून जमवत असू काचापाणी खेळायला. चांगल्या दोन मोठ्या वाट्या भरून काचा जमवल्या होत्या. त्या एकदा बाबांना दिसल्या. आणि आम्हाला शाब्दिक फटका बसला. बाबा म्हणाले हे असलं काहीतरी खेळताना एखादा तुकडा जरी फरशीवर राहून गेला आणि बांगडीची काच पायाला लागली तर काय करायचं. टाकून द्या ते. काचा जमवण्याच्या नादात एकदा आईला म्हणूनही गेले की आई, तुझी बांगडी फुटली किंवा पिचली तर टाकू नकोस आम्हाला दे. आईने आम्हाला तिची नाराजी कृतीतून दाखवली. पिचली वरून आठवलं की काचेच्या बांगडीला जर चीर गेली तर तिचा आवाज वेगळा येतो. मला सुरवातीला कळत नसे की बांगडी पिचली आहे ते कसं ओळखतात. काही दिवसांनी एका लग्नात बांगड्या भरताना भरणारी एकेक बांगडी अंगठा आणि तर्जनीत पकडून उडवल्या सारखं करे.

जयपूर ट्रीप मध्ये मी लाखेच्या बांगड्या आणल्या होत्या. बांगडीवर आरशांचे चौकोनी तुकडे लावले होते. बेडरूम मध्ये पूर्वेकडून सकाळी उन्हाची उन्हाची तिरीप येते. मी नेमकी जिथे तिरीप येते तिकडे बसले. उन्हाची तिरीप बांगड्यांवर पडली  आणि माझी खोली कवडश्यांनी भरून गेली. जणूकाही छतावर चांदण्याची गर्दीच. खोली जास्त उजळून गेली. एकदा अशाच लाखेच्या पण बारीक खडे लावलेल्या बांगड्या माझ्या मैत्रिणीनं देवीचा प्रसाद म्हणून दिला. मी त्या जवळ जवळ महिनाभर हातात घातल्या. एकदा भाकरीचं पीठ मळत असताना मला पिठात काहीतरी चमकलं. बघते तर बांगडीतला खडा होता. मनात आलं गेला महिनाभर या बांगड्या हातात आहेत. यातले किती खडे कोणा, कोणाच्या पोटात गेले असतील काय माहित.

काही वर्षांपूर्वी भर उन्हात रायगड उतरून जरा खालच्या पायरीवर विसावतो तोच मागून आवाज आला की उन्हाच्या झळा लागल्या असतील. मडक्यातलं थंड ताक पिणार का..मी मागे वळून बघितलं तर एक एक आजी एका काळ्या रंगाच्या मडक्यातलं ताक ग्लासात ओतत होती. मधेच तिने डोक्यावरचा पदर सारखा केला. तिच्या एका हातात दोन डझन मोरपिशी बांगड्या गच्च बसल्या होत्या. तिचे ते सुरकुतलेले  दोन्ही बांगडी भरले हात मला हातात घ्यावे वाटले. मी घेतलेही असते. पण तेवढ्यात ताक प्यायला गिऱ्हाईक आलं म्हणून.  मी तिला विचारलंच की इतक्या बांगड्या घालून तुम्हाला चैन कसं पडतं. त्यावर अगदी पातेलं पसरून हसली. म्हणजे तोंडात एकही दात नव्हता. ती म्हणाली गळ्यात डोरलं आणि हातात काकणं शोभा असते. मला तर खूप वर्षांची सवय आहे. आता या इतक्या उन्हात बांगड्यांचा चटका बसतो. पण हाताला सवय आहे.

एकदा एका गडावर वस्ती करायची होती. ज्यांच्याकडे आम्ही वस्तीला होतो त्यांना मदत म्हणून मी चुलीपाशी पिठलं करायला बसले. घरची बाई मोठ्या परातीत भाकऱ्या थापत होती. तव्यावरची भाकरी एका बाजूने झाली की ती भाकरी चुलीतल्या विस्तवावर उभी ठेवत होती. चुलीची धग सर्वांगाला लागत होती. तिथे हाताला तर लागणारच. प्रत्येकवेळी भाकरी फुगायला विस्तवावर ठेवली की ती एका मोठ्या पातेल्यात असलेल्या पाण्यात अर्धे हात बुडवत असे. हे असं का विचारायच्या आत ती म्हणाली, या धगीमुळे काचेच्या बांगड्या लई तापतात. असा चटका बसतो ना..मग या गार पाण्यात हात बुडवते. मग जरा गार वाटतं. 

नव्या बांगड्या भरताना हात कधी रिकामा, भुंडा करायचा नसतो. एक जुनी बांगडी ठेऊन नव्या भरायच्या आणि नंतर जुनी बांगडी वाढवायची असं एकदा आजीनं सांगितलं होतं. फार पूर्वी म्हणजे लग्न आधी वाचलेल्या दीर्घकथेतल्या काही ओळी माझ्या अजूनही लक्षात आहेत. ती म्हणते.....माझ्या हातातल्या या दोन जुन्या बांगड्या , जरी त्यावरचा वर्ख गेला असला तरी मला माझ्या आयुष्यात केलेल्या कष्टांची आठवण सतत जागी ठेवतात. आज जरी मी पैशांच्या राशीत असले तरी मी आणि ह्यांनी केलेल्या कष्टांचं चीज झालं. त्यावेळी सोन्याच्या चार बांगड्या विकून आज हा पसारा वाढवू शकले.  हातात फक्त काचेच्या बांगड्यांसोबत यांची मला आणि माझी यांना भक्कम साथ होती. त्याच वेळच्या या दोन बांगड्या मी आजही प्राणपणाने जपल्या आहेत. जरा बरे दिवस आल्यावर यांनी मला  सोन्याच्या बांगड्या आणल्या. मी पुन्हा सोनेरी वर्खाच्या बांगड्या भरल्या. पण या जुन्या नाही काढल्या. मला त्या सोन्याच्या बांगड्यांपेक्षा प्रिय आहेत. देवाच्याही या बांगड्या जपण्याचं मनात असणार. कारण इतके कष्ट करूनही या शाबूत आहेत. मुलं हे सांगितल्यावर हसतात. हसोत. पण माझी या बांगड्यांवर श्रद्धा आहे. देव न करो पण पुढे मागे या बांगड्या वाढवल्या तर त्याचे तुकडे पण मी जपून ठेवेन. आणि माझ्या शेवटच्या प्रवासात त्यांना माझ्या सोबत ठेवा असं मुलांना सांगेन.  

तर अशी ही बांगडीची कथा. सांगण्यासारखं अजून खूप आहे पण आता थांबते.