Thursday 14 March 2024

आठवणींचं कडबोळं

  

पिंजर लावायला म्हणून आरशासमोर उभी राहिले. अनामिकेने पिंजर लावत असताना मनगटाखाली भाजल्याच्या चंद्रकोरी उमटलेल्या दिसल्या आणि आठवलं लेक घरी जेवायला घरी आली होती. तिच्या घरच्या बाईच्या हाताच्या चवीचा कंटाळा आल्यानं तिला आईच्या हातची अंबाडीची भाजी नि भाकरी खायची होती. भाकरी करताना खोलगट तव्यावर भाकरी टाकून झाल्यावर पाणी फिरवताना अनेकदा मनगटाखाली चटके बसले होते.

पूजा करताना किंवा एखाद दिवशी जास्तीची कामं करताना या भाजक्या चंद्र्कोरी बघितल्या की मला आजीची आठवण होतेच होते. तिच्या बांगडी भरल्या हातावर कायम या काळसर चॉकलेटी भाजक्या चंद्रकोरी असत. आजीच्या कामाविषयी आई अनेकवेळा भरभरून बोलते. दिवसाला दररोज ४०-५० भाकरी चुलीवर भाजाव्या लागत. आणि सगळा स्वयंपाकही असायचाच. तशात ती जर गरोदर असली तर मग ते चुलीपाशी अवघडून बसणं, तिने पाय पसरले की पोटातल्या जीवालाही जरा पाय पसरायला मिळे. इतक्या भाकरी भाजून, बाकीचा स्वयंपाक करून तिची अन्नावरची वासना जात असे. तिची वासना गेली असली तरी पोटातल्या जीवाचं काय? मग अशा वेळेस ती चार पाच लसणीच्या पाकळ्या ठेचून घेत असे. कोनाड्यात एका टोपलीत वाळक्या मिरच्या असत त्यातल्या दोन मिरच्या घेत असे. आणि भाकरी झाल्यावर त्याच खोलगट तव्यावर चमचाभर तेल घालून ठेचलेली लसूण, मिरची घालत असे. त्यातच  भाकरीवर पाणी फिरवायला जे भांड घेतो त्यात जे पीठ जमा होई ते पिठाच्याच बोटांनी ढवळून तव्यावरच्या फोडणीत घालत असे. नुसत्या लसूण, मिरचीच्या वासानेही पोटातला जीव आनंदाने उड्या मारतो असं तिला वाटत असे. खरी गोष्ट अशी होती की तिला भूक लागलेलीच समजत नसे. एका वाफेत ती ज्वारीच्या पिठाची उकड शिजत असे. तिथे जवळच असलेल्या ताटलीत ती सगळी उकड काढायची त्याला मधोमध एक विहीर करून त्यात कच्चं तेल घालून सावकाशपणे बोटाने चाटत खायची. वर ताक प्यायचं. झालं एका गर्भारशी बाईचं जेवण.

याशिवाय शेतातून आलेला भुईमूग असो, चिंच असो की तूर असो. एकादशीच्या आधी दाण्याचं कूट संपलं असलं तर भुईमुगाच्या शेंगा त्यांची नाकं ठेचून त्यातले दाणे काढायचे. चिंच आलेली गावात लोकांना कशी कळायची कोण जाणे. रोज चार/ पाच जणं तरी चिंचेबद्दल विचारायला येतच. मग जरा सवड मिळाली की खल उपडा घालून त्यावर लाकडी दांडक्याने चिंचेवर घाव घालून चिंचोके आणि शिरा/ रेषा वेगळे काढून चिंच फोडून ठेवायची. आई, मी , मावश्या सुट्टीत गेलो की आम्ही मदत करत असूच. पण तिच्या कष्टांना पारावर नव्हता.

आज मिक्सर , फूड प्रोसेसर वापरताना आजीचे हात आठवतात. आपल्या वाळक्या , शुष्क तरीही तळव्याला मऊ असलेले हात आठवतात. गॅस गिझरचं पाणी अंगावर घेताना, बंबातलं कढत कढत पाणी घंगाळातून अंगावर घेताना पाण्याला येणारा एक वेगळा वास अजूनही नाकात जाणवतो.

माझ्या एका मित्राने एके ठिकाणी लिहिलं होतं की वारसा नावाची एक नितांतसुंदर चीज असते आपल्या आयुष्यात. हा वारसा काय असतो? तर आपल्या आई वडलांकडून आलेल्या गुण दोषांचा, लहानपणी ऐकलेल्या गोष्टींचा, गाण्याचा, वाचलेल्या पुस्तकांचा, आलेल्या अनुभवांचा हा वारसा आपल्याला भूतकाळात घट्ट पाय रोवून उभं रहायला शिकवतो. आपल्या पुढच्या आयुष्य या वारशाची एक घट्ट विणीची गोधडी तयार  तयार होते. ही गोधडी आपल्यावर कायम पांघरलेली असते.

एक दिवस दुपारी घरी असताना ओळखीची बेल वाजली. बघते तर आई दारात उभी होती. आई घरात आली. तिने माझ्या हातात आठ रुपये दिले आणि म्हणाली हे आठ रुपये मीनूच्या पिगी बँकेत टाक. रिक्षाने येणार म्हणून हातात ठेवले पण रिक्षाच मिळाली नाही. घोटभर पाणी पिऊन आई म्हणाली मी जरा आडवी पडते गं. दमलेय उन्हातून. आई एखाद्या लहान मुलासारखी कुशीवर झोपली होती. लहान मूल अत्यंत विश्वासाने आपल्या आईजवळ झोपतं तशीच ती झोपलेल्या मिनू जवळ आडवी झाली. चेहरा दमलेला होता. बाबा गेल्यापासून आई आपल्या खाण्या पिण्यावर लक्ष देत नाही असं एकदम जाणवून पोटात खड्डा पडला. मुलगी म्हणून मला यात दुर्लक्ष करून चालणार नाही. एकदम अपराधी वाटलं. तासाभराने आई आणि तिची नात दोघीही उठल्या. झोप पुरी झाल्यामुळे असेल पण दोघी ताज्यातवान्या दिसत होत्या. आई टेबला जवळ येऊन बसली. मी पोळ्या करत होते. मला वाटलं की आई आता पोळपाट लाटण्याचा ताबा घेते की काय..पण तसं काही झालं नाही. म्हणाली भूक लागली आहे. दोन दिवस नीट खाल्लंच नाही. बरं वाटत नव्हतं. शेवटी आज वाटलं आता तुझ्याकडे आजचा दिवस राहावं. आराम करावा. मला पोटात प्रचंड तुटलं. म्हणाले अगं तरीच फोनवर तुझा आवाज ओढलेला वाटला. ती नुसतीच हो म्हणाली.

मी एका छोट्या ताटलीत गरम पोळी तेलाचं बोट लावून वाढली. एका छोट्या वाटीत काल रात्री केलेला सुधारस वाढला. कडेला तूप वाढलं आणि आईसमोर ताटली ठेवली. आईनं कुठलासा श्लोक म्हणून जेवायला सुरवात केली. पहिला घास खाल्यावर लगेच म्हणाली छान खमंग झालीये पोळी. सुधारसा सोबत मस्तच लागतीये. घरातल्या बाईला अशी आपण केलेल्या पदार्थांची पावती किती लोकं पहिला घास खाल्ल्या खाल्ल्या देत असतील माहित नाही. देत असतील तर छानच. पण देत नसाल तर द्याच. मग पुढे काय जादू होते ते अनुभवा. जेवण झाल्यावर अन्नदाता सुखी भव म्हणत उठली. म्हणाली आज पोटात गोविंद गोविंद वाटतंय. मला तर माझंच पोट भरल्या सारखं वाटत होतं. जी आपली आई मी संध्याकाळी शाळेतून घरी आल्यावर चहा बरोबर गरम गरम पोळी करून देत असे तिला आज आपण गरम गरम पोळी करून वाढली याचं कोण समाधान वाटलं. सगळं आटपून आत गेले तर आईचा परत डोळा लागलेला. आणि तिची नात तिला डोक्यावर, कपाळावर जो..जो..असं म्हणत थोपटत होती. मित्र म्हणतो ती वारशाची वीण हीच.

एके दिवशीची गोष्ट. कामं अगदी पाठीला पाठ लावल्यासारखी आली होती. साय तळाला गेली होती. ती सायीच्या भांड्यात काढायची होती. कणिक भिजवायची होती. मुलगी शाळेतून यायच्या आधी तिच्या आवडीचा कोथिंबीरीचा पराठा करायचा होता. साय काढून दुधाच्याच भांड्यात कणिक काढली. दुधातल्या सायीमुळे भांड्याला एक प्रकारचा ओशटपणा येतो. आपण जर दुधाच्या भांड्यात कणिक भिजवली तर तो सगळा ओशटपणा कणकेत मिसळून दुधाचं भांडं एकदम स्वच्छ होतं. आणि इतर भांड्यांना तो ओशटपणा लागत नाही. हा वारसा पणजी, आजी आणि आईकडून माझ्याकडे आलेला.

तुपाच्या बेरीचीही तीच गोष्ट. तूप कढवून दोन दिवस झाले होते. तुपाची बेरी काढून ती फ्रीज मध्ये ठेवली होती. एक दिवस सकाळी सकाळी चुलत सासरे आले. नाश्त्याला एक खमंग थालीपीठ दिलं. नको नको म्हणत अगदी आवडीनं खाल्लं. थालीपिठाचा समाचार घेऊन झाल्यावर त्यांनी हे कसलं थालीपीठ आहे विचारलं. म्हणाले बेरीचं. बेरीत ज्वारी आणि तांदुळाचं पीठ घातलं. दोन कांदे, भरपूर कोथिंबीर घातली. तिखट मीठ घालून ते एकत्र करून त्याची ही थालीपीठं केली. बेरी आणि त्यातला तुपाचा अंश दोन्ही वाया न जाता उपयोगाला आले. हा चवींचा आणि निगुतीचा वारसा.

आपलं घर, आपल्या घराच्या चार भिंती त्यांचे कोपरे, थोडक्यात आपली वास्तू कायम आनंदी रहायला हवी असेल तर आपलं घर स्वच्छ ठेवणं आवश्यक आहे. जुनं, नको असलेलं समान, कागद पत्र वेळ मिळेल तेव्हा फाडून टाकावं. मला असं केल्यावर माझं घर मोकळा श्वास घेतंय असं वाटतं. सुट्टीत आजोळी दिवाळीत एकदा पहाटे पहाटे उठले आणि चहा प्यायला स्वयंपाकघरात गेले. तिथे पेट्रोमॅक्सच्या दिव्याच्या  उजेडात आजी चहाची तयारी करत होती. चुलीवर नजर गेली आणि बघते तर आदल्या दिवशी रात्री भाकरी करत असताना पिठमय झालेल्या चुलीचा मागमूस नव्हता. आम्ही मुलं जेवून वरच्या माडीत गेलो. पण आजीने सगळ्यांची जेवणं झाल्यावर चुलीतले निखारे काढून, चूल शेणाने सारवून त्यावर रांगोळी काढली होती. हळद कुंकवाची बोटंही दिसत होती त्या पेट्रोमॅक्सच्या दिव्यात.

मला मी जेव्हा माझी गॅसच शेगडी स्वच्छ पुसते तेव्हा ती सारवलेली चूल नेहमी डोळ्यासमोर येते. आपला स्वयंपाकघराचा ओटा, ओट्या खालचे ड्रॉवर, सिंक, सिंक खालची जागा हे महिन्यातून एकदा. खरं तर दोनदा सगळी भांडी, चमचे, कप, बाहेर काढून स्वच्छ करावेत. कोपऱ्यातून आणि कडेने दोन तीन लवंगा ठेचून आणि मिरी ठेवाव्यात. त्यावासाने झुरळांची, मुंग्यांची तिथपर्यंत यायचं नाही याची लक्ष्मणरेषा ठरून जाते. सिंकच्या खाली कचऱ्याचा डबा असेल आणि ओल असेल तर हमखास झुरळं, गोम, घोण यांची छुपी वस्ती असतेच असते. वर्षातून तीनवेळा हर्बल पेस्ट कंट्रोल करून घ्यावं. स्वयंपाकघर हे आपल्या संपूर्ण वास्तूचं हृदय असतं. ते जर ठणठणीत असेल तर घरातल्या सगळ्यांची प्रकृती उत्तम राहील यात शंकाच नाही.

पाणी हे जीवन आहे हे आपण लहानपणी शिकलोच आहोत. आज बातम्यांमधून, सोशल मिडिया वरून आपण गावात पडलेला दुष्काळ बघू शकतो. शहरात त्याची इतकी झळ बसत नसली तरी पाण्याचा वापर हा आपल्या कडे असलेल्या मौल्यवान गोष्टीसारखा केला पाहिजे. दिवसेंदिवस पाण्याचा नैसर्गिक स्रोत कमी होतोय. पावसावर आपले पुढचे काही महिने अवलंबून असतात. पालेभाज्या धुतलेलं पाणी आपण आपल्या घरगुती बागेत वापरू शकतो. नळाची धार कमीच ठेवावी. दात घासत असताना असताना अनेकजण नळ सुरु ठेवून दात घासत असतात. एक दिवस ते पाणी मोजून बघा किती वाया जातं ते. कुकर लावला असेल तर तळाला असलेलं गरम पाणी ओशट, तुपकट भाडी धुण्यासाठी किंवा मिक्सरचं भांडं धुण्यासाठी करू शकता. इंधन आणि पाणी दोन्ही वाचेल.

 दिवसातून एकदा आपल्या घरातल्या प्रत्येक खोलीच्या कोपऱ्यातून एक मायेची नजर फिरवा. त्यावेळी चांगले विचार मनात आणा. वास्तू तर काय तथास्तु..तथास्तु म्हणतच असते.

गजरा

 आता अजून एक मुलींच्या, बायकांच्या आवडीची गोष्ट सांगते. एका लग्नाला मुहूर्ता नंतर लहान लहान मुलं , मुली स्टेजवर फुलांच्या पाकळ्या गोळा करत होती. त्या लग्नात अक्षता नावापुरत्याच टाकून नवरा नवरीच्या जवळपास उभं असणाऱ्यांना मिक्स फुलांच्या पाकळ्या दिल्या होत्या. ती मुलं पाकळ्या गोळा करून एकमेकांच्या अंगावर उधळत होती. त्यात एक मुलगी मात्र म्हणाली की, माझ्या डोक्यावर हे टाकू नका. माझा गजरा खराब होईल. मला लग्नात सगळ्यांचं निरीक्षण करायला खूप आवडतं. आपला वेळही छान जातो त्यात. नवर्याच्या मित्राच्या मुलाचं लग्न होतं. नवरा त्याच्या मित्र मंडळीत असल्यामुळे  मी एकटीच स्टेज समोरच्या खुर्चीत बसून होते. मी पण कोणे एकेकाळी केलेला लहान मुलांचा वेडेपणा एन्जोय करत होते. त्या मुलांच्यात हेयर band सारखा गजरा लावलेली एक मुलगी होती. अगदी जसा लहान मुलांना आवडतो तसाच मोगऱ्याच्या कळ्यांचा गजरा लावला होता. खेळताना मधेच गजरा जागेवर आहे का नाही ते चाचपून बघत होती. तिच्यात लहानपणीची मी बघत होते. आमच्या शाळेच्या रस्त्यावर गुलबक्षीची खूप झाडं होती. मी त्याची अनेकदा फुलं घरी आणत असे.  फुलांची देठं एकमेकात विणून माझी मावशी त्याची सुंदर गजरा करत असे. चंद्रकोरीसारखा दिसे गजरा. मावशीच्या काळ्या, लांबसडक वेणीवर हा गजरा अगदी उठून दिसायचा. मला हा गजरा खूप आवडायचा. पण माझा बॉबकट असल्यानं मला हा गजरा घालताच यायचा नाही. शेवटी गजरा घालायला मिळावा म्हणून  मी ठरवून केस वाढवायला सुरवात केली आणि शाळेजवळची रोपं जाऊन तिथे बांधकाम सुरु झालं. त्यानंतर पुढे किती तरी वर्षांनी मला अशीच झाडं कोकणात दिसली. पण मावशीसारखा गजरा काही कोणाला जमला नाही.

आमच्या वर्गातली एक मुलगी एक दिवस मोत्याचा गजरा वाटावा असा तगरीच्या कळ्यांचा देठं काढून ओवून केलेला गजरा लावून आली होती. तिच्या काळ्याभोर   केसात जणू मणीच ओवल्यासारखे दिसत होते. झालं...मलाही तसाच गजरा हवासा वाटू लागला. पण आमच्याकडे तगरीचं झाड नव्हतं. पण शेवटी माझी तगरीचा गजरा घालायची इच्छा पूर्ण झालीच. एक दिवस माझ्या वर्गातल्या मैत्रिणीनंच मला रुमालात बांधून तगरीच्या कळ्या आणून दिल्या. म्हणाली..या घे बाई कळ्या. आणि घाल करून गजरा. मला कधी एकदाची मी घरी जाते आणि गजरा करते असं झालं. मी घरी गेले. हात पाय धुऊन एका ताटलीत कळ्या ओतल्या. मी कात्रीनं कळ्यांची देठं कापायला लागले. तेवढ्यात आई शाळेतून आली. तिने हा काय प्रकार आहे विचारलं. मी सगळं सांगितल्यावर मुक्या कळ्या तोडू नयेत गं मंजिरी. झाडालाही वाईट वाटू शकतं. मला ते मनापासून पटलं. आई म्हणाली..आज असं केलंस. पण परत असं करू नकोस. कर त्याचा गजरा. आणि घाल डोक्यात. त्या दिवशी मी तो कळ्यांचा गजरा घातला खरा..पण मनातून खूप वाईट वाटत होतं.

मोगरा, मदनबाण, जाई, जुई या फुलांच्या कळ्यांचा जरी गजरा घातला तरी त्या नंतर उमलणाऱ्या असतात. मला मे महिन्यात मिळणाऱ्या मदन बाणाचा गजरा सगळ्यात आवडतो. एकदा कामाच्या ठिकाणी संध्याकाळी मी मदनबाणाचा गजरा लावला होता. एक आजोबा काही कामासाठी आले. काम झाल्यावर जाता जाता मला म्हणाले , तुमच्या गजऱ्याचा सुंदर वास येतोय. कसला गजरा आहे हा..मी माझ्या भाच्यांसाठी न्यावं म्हणतोय. मी नाव सांगितलं. दुसऱ्याच दिवशी ते परत आले. त्यांनी मला एका पानाची गुंडाळी दिली. त्यात मदनबाणाच्या उमलू पहाणार्या फुलांचा गजरा होता. या काळ्या पूर्ण उमलल्या शिवाय याचा वास येत नाही. पण एकदा का या काळ्या उमलल्या तर याच्या सुंदर वासाने सारा आसमंत सुगंधित करून टाकतो. काय सुरेख निर्मिती आहे ही सृष्टीची.

तेच गोष्ट चमेली, जाई, जुई मोगर्याची. सकाळी न्हाऊन केसांची छानशी  बट वेणी घालावी. त्यावर एखादा सुंदर, मनमोहक वासाचा गजरा घालायचा. केस जरा ओले असतील तर छानच. छान अशाकरता की ओलेत्या केसांवर या फुलांचा वास खूप वेळ टिकून रहातो. आपल्या अवती भवती असणाऱ्यांना हा मंद सुवास विशेष जाणवतो. मला उग्र वासाचा सुरंगीचा गजरा फारसा आवडत नाही. बकुळीचा वासही तसा उग्रच. पण तरीही आवडणारा. पण हल्ली बकुळीचं झाडं बघायलाही महाग झालंय. अबोलीचा गजरा मला बघायला आवडतो. अबोलीच्या फुलांचा रंग मला प्रसन्नतेचं प्रतिक वाटतो.

लहान असताना एकदा कोणत्यातरी सिनेमात एका दृश्यात एका सुंदर सजवलेल्या हॉलमध्ये एक बाई आलेल्या पाहुण्यांचं स्वागत मनगटाला गजरा बांधून करत होती. त्यानंतर मी सहजच मनगटाला गजरा बांधला. आणि आईच्या माराला सामोरी गेले. मला मी मार का खाल्ला याचा प्रश्न पुढे बरेच वर्ष पडत होता पण उत्तर मिळत नव्हतं.

एकदा एका कार्यक्रमात विद्या बाळ प्रमुख पाहुण्या होत्या. आम्ही सगळ्या जणींनी मोगर्याचा गजरा लावला होता. एक गजरा उरला होता. सहजच मी त्यांना तो दिला. सोबत पीनही दिली. त्यांनी पिन परत केली. मला वाटलं की त्या तो गजरा केसाच्या एका बटेत अडकवतील. थोड्यावेळाने बघितलं तर त्यांनी तो गजरा लहान मुलांना रुमाल लावतात तसा डाव्या बाजूला गोल करून लावला होता. मला ही गजरा लावण्याची कल्पना आवड्लीच. मी त्यांना तसं म्हणालेही. त्या म्हणाल्या की अगं इतका सुंदर वास असलेल्या गजरा आहे तर मला नको का वास यायला. आता इथे मी हा लावल्यामुळे मी त्याचा वास घेण्याचा आनंद उपभोगू शकतेय. काय बरोबर ना...त्या जे म्हणाल्या ते मला पटलं. पण तसा गजरा लावण्याचं माझं अजून तरी काही धारिष्ट्य झालेलं नाही.

 

 

बांगड्या

 

त्या दिवशी बऱ्याच वर्षांनी बांगड्यांच्या दुकानात गेले. निमित्त होतं माझ्या मुलीच्या संक्रांतसणाचं. तिला यावर्षी बांगड्या लुटायच्या होत्या. दुकान तसं छोटंसंच होतं. पण बांगड्यांचे रंग आणि प्रकार खूप होते. मला आवडतील अशा बांगड्या निवडीला वाव होता. माझ्यासाठी मी आमसुली रंगाच्या वर्खाच्या बांगड्या घेतल्या. अगदी हातात घालून सुद्धा बघितल्या.  त्या आमसुली रंगाकडे बघत माझ्या आजोळची आठवण झाली. मे महिन्यात आम्ही सगळी मावस, मामे भावंडं रहिमतपूरला जमत असू.

स्वयंपाकघरात आजी  नेहमीच चुलीपाशी बसलेली असे. आम्ही मुलं पुढ्यात ताट घेऊन अंगत पंगत करून बसायचो. सहज आठवलं. सुट्टीतल्या एके दिवशी दोन चुलींपैकी एका चुलीवर मोठ्या पोळपाटावर सांज्याची पोळी लाटत होती. लाटताना तिच्या हातातल्या काचेच्या बांगड्या मागेपुढे होत होत्या. त्यांची नाजूक किणकिण ऐकू येत होती, आजीच्या दोन्ही हातात मिळून आमसुली रंगांच्या साताठ बांगड्या होत्या.  दुसऱ्या चुलीवर भाजीसाठी तेल तापवत ठेवलं होतं. जवळच असलेल्या जमिनीतल्या उखळीत तिने दोन मिरच्या, चार लसणीच्या पाकळ्या ठेचायला टाकल्या.  त्या ठेचताना पुन्हा तोच बांगड्याचा आवाज. पण यावेळची आवाजाची लय वेगळी होती. मी वर्षानुवर्ष आजीचे हात त्याच आमसुली रंगाने भरलेले बघितले आहेत. तिला तोच रंग आवडायचा.

आजी म्हणायची, पोरी माहेरपणाला आल्या आहेत. त्यांना आवडतील त्या बांगड्या भरायला जाऊदेत. आम्ही मुली आणि आई, मावश्या शेजारीच असलेल्या कासाराकडे बांगड्या भरायला जायचो. तिथे वरपासून खालपर्यंत बांगड्यांची भिंत होती. शिवाय एकत्र गोल बांधून ठेवलेल्याही होत्याच. आईनं पण आम्सुलीच भरल्या. मला पण तशाच रंगाच्या हव्या होत्या. पण लहान मुलांच्यात तशा येत नाही म्हणून सांगितलं. तू पाकिजा पिच्चर बघितलास का तिनं विचारल्यावर मी मानेनेच नाही म्हंणलं. त्या पिच्चर मधल्यासारख्या भरते तुला. या बघ रेशमी पिवळ्या पिवळ्या. मला मुळातच बांगड्या घालायची हौस. त्यात कुठल्या तरी सिनेमात घातलेल्या नटीनं सारख्याच माझ्या बांगड्या आहेत म्हणल्यावर मला आनंदच झाला. मी एकेका हातात चांगल्या डझनभर बांगड्या भरल्या. पुढे जसा वयानुरूप हात मोठा झाला तशा माझ्या आवडत्या रंगाच्या बांगड्या मला मिळाल्या. आजी कडून आईला आणि आईकडून मला ही रंगाची आवड झिरपली होती. कणिक भिजवताना आई उजव्या हातातल्या बांगड्या जितक्या घट्ट बसवता येतील तितक्या मागे सारायची. नाहीतर बांगड्या पीठमय होतील. तरीही त्यातली सगळ्यात पुढे असलेली बांगडी यायचीच पुढे.

एकदा फोटो काढायला स्टुडियोत गेलो होतो. माझ्या हातात हिरव्या वर्खाच्या होत्या. आम्हाला आमचे हात फुली केल्यासारखे ठेवायला सांगून फोटोग्राफर फोटो काढणार तेवढ्यात मी हाताची फुली सोडून माझ्या बांगड्या मनगटापाशी आणल्या. हलू नकोस गं असं फोटोग्राफरनं म्हणल्यावर , मग बांगड्या नीट नाही ना दिसणार म्हणून पुढे केल्या असं मी त्याला म्हणाले. तो फोटो आजही बघताना हा संवाद आम्हा सगळ्यांना आठवतो.

 

आईच्या हातात कायम काचेच्या बांगड्यांमध्ये दोन बिलवर असायचे. ती पाटल्या कधीतरीच घालत असे. दिवाळीत सगळ्यात मागे पाटल्या त्यानंतर दोन काचेच्या, पुढे दोन दोन बिलवर घातलेले आईचे मौ सूत हात आम्हाला तेल लावायचे तेव्हा तिच्या बांगड्यांच्या किण किण आवाजात ब्रह्मानंदी टाळी लागायची.

मला वेगवेगळ्या बांगड्या जमवायचा छंद आहे. त्यात खास करून काचेच्या आणि लाखेच्या बांगड्या मला आवडतातच. पण आमच्या घरात जेव्हा एका बंगाली कुटुंबाशी नातं जोडलं गेलं तेव्हा मला शंखाच्या बांगड्याही आवडायला लागल्या. पण त्या बांगड्या फक्त लग्न झालेल्या बायकाच घालू शकतात असं कळलं. शुभ्र पांढऱ्या कोरीव काम केलेल्या शंखाच्या बांगड्या सगळ्यात मागे , त्याच्यापुढे लाल चुटूक बांगडी. कसलं सुंदर कॉम्बिनेशन आहे हे. शिवाय या लाल बांगडीच्या पुढे एकेक सोन्याचं कडं. तेही मा शारदा बाला डिझाईनचं. शंखाच्या बांगड्या शरीरातील उष्णता कमी करते शिवाय एकूणच बांगड्यांच्या घर्षणाने रक्ताभिसरण सुधारतं अनेकांकडून ऐकलंय आणि वाचलंय पण.

लहान असताना आम्हा मुलीना अजून एक नाद होता. आम्ही मातीतून बांगड्याचे तुकडे शोधून जमवत असू काचापाणी खेळायला. चांगल्या दोन मोठ्या वाट्या भरून काचा जमवल्या होत्या. त्या एकदा बाबांना दिसल्या. आणि आम्हाला शाब्दिक फटका बसला. बाबा म्हणाले हे असलं काहीतरी खेळताना एखादा तुकडा जरी फरशीवर राहून गेला आणि बांगडीची काच पायाला लागली तर काय करायचं. टाकून द्या ते. काचा जमवण्याच्या नादात एकदा आईला म्हणूनही गेले की आई, तुझी बांगडी फुटली किंवा पिचली तर टाकू नकोस आम्हाला दे. आईने आम्हाला तिची नाराजी कृतीतून दाखवली. पिचली वरून आठवलं की काचेच्या बांगडीला जर चीर गेली तर तिचा आवाज वेगळा येतो. मला सुरवातीला कळत नसे की बांगडी पिचली आहे ते कसं ओळखतात. काही दिवसांनी एका लग्नात बांगड्या भरताना भरणारी एकेक बांगडी अंगठा आणि तर्जनीत पकडून उडवल्या सारखं करे.

जयपूर ट्रीप मध्ये मी लाखेच्या बांगड्या आणल्या होत्या. बांगडीवर आरशांचे चौकोनी तुकडे लावले होते. बेडरूम मध्ये पूर्वेकडून सकाळी उन्हाची उन्हाची तिरीप येते. मी नेमकी जिथे तिरीप येते तिकडे बसले. उन्हाची तिरीप बांगड्यांवर पडली  आणि माझी खोली कवडश्यांनी भरून गेली. जणूकाही छतावर चांदण्याची गर्दीच. खोली जास्त उजळून गेली. एकदा अशाच लाखेच्या पण बारीक खडे लावलेल्या बांगड्या माझ्या मैत्रिणीनं देवीचा प्रसाद म्हणून दिला. मी त्या जवळ जवळ महिनाभर हातात घातल्या. एकदा भाकरीचं पीठ मळत असताना मला पिठात काहीतरी चमकलं. बघते तर बांगडीतला खडा होता. मनात आलं गेला महिनाभर या बांगड्या हातात आहेत. यातले किती खडे कोणा, कोणाच्या पोटात गेले असतील काय माहित.

काही वर्षांपूर्वी भर उन्हात रायगड उतरून जरा खालच्या पायरीवर विसावतो तोच मागून आवाज आला की उन्हाच्या झळा लागल्या असतील. मडक्यातलं थंड ताक पिणार का..मी मागे वळून बघितलं तर एक एक आजी एका काळ्या रंगाच्या मडक्यातलं ताक ग्लासात ओतत होती. मधेच तिने डोक्यावरचा पदर सारखा केला. तिच्या एका हातात दोन डझन मोरपिशी बांगड्या गच्च बसल्या होत्या. तिचे ते सुरकुतलेले  दोन्ही बांगडी भरले हात मला हातात घ्यावे वाटले. मी घेतलेही असते. पण तेवढ्यात ताक प्यायला गिऱ्हाईक आलं म्हणून.  मी तिला विचारलंच की इतक्या बांगड्या घालून तुम्हाला चैन कसं पडतं. त्यावर अगदी पातेलं पसरून हसली. म्हणजे तोंडात एकही दात नव्हता. ती म्हणाली गळ्यात डोरलं आणि हातात काकणं शोभा असते. मला तर खूप वर्षांची सवय आहे. आता या इतक्या उन्हात बांगड्यांचा चटका बसतो. पण हाताला सवय आहे.

एकदा एका गडावर वस्ती करायची होती. ज्यांच्याकडे आम्ही वस्तीला होतो त्यांना मदत म्हणून मी चुलीपाशी पिठलं करायला बसले. घरची बाई मोठ्या परातीत भाकऱ्या थापत होती. तव्यावरची भाकरी एका बाजूने झाली की ती भाकरी चुलीतल्या विस्तवावर उभी ठेवत होती. चुलीची धग सर्वांगाला लागत होती. तिथे हाताला तर लागणारच. प्रत्येकवेळी भाकरी फुगायला विस्तवावर ठेवली की ती एका मोठ्या पातेल्यात असलेल्या पाण्यात अर्धे हात बुडवत असे. हे असं का विचारायच्या आत ती म्हणाली, या धगीमुळे काचेच्या बांगड्या लई तापतात. असा चटका बसतो ना..मग या गार पाण्यात हात बुडवते. मग जरा गार वाटतं. 

नव्या बांगड्या भरताना हात कधी रिकामा, भुंडा करायचा नसतो. एक जुनी बांगडी ठेऊन नव्या भरायच्या आणि नंतर जुनी बांगडी वाढवायची असं एकदा आजीनं सांगितलं होतं. फार पूर्वी म्हणजे लग्न आधी वाचलेल्या दीर्घकथेतल्या काही ओळी माझ्या अजूनही लक्षात आहेत. ती म्हणते.....माझ्या हातातल्या या दोन जुन्या बांगड्या , जरी त्यावरचा वर्ख गेला असला तरी मला माझ्या आयुष्यात केलेल्या कष्टांची आठवण सतत जागी ठेवतात. आज जरी मी पैशांच्या राशीत असले तरी मी आणि ह्यांनी केलेल्या कष्टांचं चीज झालं. त्यावेळी सोन्याच्या चार बांगड्या विकून आज हा पसारा वाढवू शकले.  हातात फक्त काचेच्या बांगड्यांसोबत यांची मला आणि माझी यांना भक्कम साथ होती. त्याच वेळच्या या दोन बांगड्या मी आजही प्राणपणाने जपल्या आहेत. जरा बरे दिवस आल्यावर यांनी मला  सोन्याच्या बांगड्या आणल्या. मी पुन्हा सोनेरी वर्खाच्या बांगड्या भरल्या. पण या जुन्या नाही काढल्या. मला त्या सोन्याच्या बांगड्यांपेक्षा प्रिय आहेत. देवाच्याही या बांगड्या जपण्याचं मनात असणार. कारण इतके कष्ट करूनही या शाबूत आहेत. मुलं हे सांगितल्यावर हसतात. हसोत. पण माझी या बांगड्यांवर श्रद्धा आहे. देव न करो पण पुढे मागे या बांगड्या वाढवल्या तर त्याचे तुकडे पण मी जपून ठेवेन. आणि माझ्या शेवटच्या प्रवासात त्यांना माझ्या सोबत ठेवा असं मुलांना सांगेन.  

तर अशी ही बांगडीची कथा. सांगण्यासारखं अजून खूप आहे पण आता थांबते.


Saturday 4 August 2018

जन्मसावित्री/ अहेवपण

नमस्कारासाठी वाकले. जन्मसावित्री हो असा आशीर्वाद दिलेला ऐकला आणि याआधी कोणी बरं असा आशीर्वाद दिला होता ते आठवत होते. २०/२२ वर्ष मागे गेले. आमच्या लायब्ररीत जोडीनं येणारे बरेच आहेत. अगदी एक त्याच्या आवडीचं आणि एक तिच्या आवडीचं पुस्तक घेणारेही आहेत. काहींच्यात अहो तुम्ही माझ्या आवडीचा कथासंग्रह घेतच नाही. मला तुमची ती राजकारणावरची पुस्तकं आणि ते लेख वाचायचा कंटाळा येतो असंही म्हणणारी मेहुणं आहेत. काही जोडप्यातली एक जण निव्वळ सोबत म्हणून येणारी आहेत. अशाच जोडप्यांपैकी सौ. सु.वा. भट अशी सही करून सहीच्या खाली आडवी रेष मारून दोन टिंब देणाऱ्या भट काकू मला आठवल्या.
आमच्याच रस्त्यावर तू जागा घेतली आहेस ना मग ये ना एखाद दिवशी, असं नेहमी म्हणत. मी ही हो..हो..येईन..येईन म्हणत असे. भट काकूंच्या गोरेपणाचं वर्णन करायचं झालं तर कुठल्याश्या कादंबरीत एका मुलीचं वर्णन करताना लिहिलेले शब्द मला नेहमी आठवत. लाल भडक गुलाबाच्या पाकळ्या दुधात कुस्करल्या तर त्या पाकळ्यांचा रंग दुधात मिसळून जो गुलाबी रंग येईल अगदी तश्याच वर्णाच्या होत्या. हातात पाटल्या बांगड्यांसोबत मध्ये हिरव्या वर्खाच्या बांगड्या असायच्या. कपाळावर बरोब्बर मधोमध सिंगारचं लाल कुंकू चमकत असायचं. एकही केस वेणीच्या बाहेर येणार नाही इतपत तेल लावलेले काळे भोर केस होते त्यांचे. खांद्याला एक लांब पट्ट्याची पर्स कम पिशवी असायची. भट काकांना ऐतिहासिक पुस्तकांची प्रचंड आवड. लायब्ररीत आल्यावर पिशवीतून काकांना पुस्तकं काढून आपण स्वतः खुर्चीवर बसून राहत. त्यांचं हसणं खूप छान होतं. आवाज मात्र बोलताना कापायचा. बोलताना मधले शब्द काहीवेळा ऐकूच यायचे नाहीत. दोघांची वयं झालेली. काका तर जास्तच वयस्कर. ते दोघेच. त्रिकोण पूर्ण व्हायला तिसरं कोणीच आलं नाही. अशावेळी बायका आपल्या नवऱ्याची आपल्या पोरागत काळजी घेतात तसंच काहीसं यांचंही झालं होतं. आणि ते बघायलाही छान वाटायचं.
काका काकूंची पंधरा दिवसातून एकदा तरी फेरी व्हायचीच. पण त्यावेळी महिना झाला तरी ती दोघं फिरकली नाहीत. काकांना अधून मधून बरं नसायचं पण तरी तसे बरे होते. वाचन हे त्यांच्यासाठी टॉनिक होतं. त्यांच्याच सोसायटीतल्या एकांकडे त्यांच्याबद्दल चौकशी केली. काका गेल्याचं कळलं. अरे बापरे! काय हे? आता काकूंचं कसं होणार? अनेक प्रश्न मनात आले. दोघं होती तेव्हा जायला जमलं नाही. आणि आता त्यांना भेटायचं तर पावलं जड झाली माझी. हिय्या करून गेलेच. दार लोटलेलं होतं. घरात काकू पाटावर तांदूळ निवडत बसल्या होत्या. मी समोरच बसले. जरावेळ शांतता...काकू म्हणाल्या..बघ तुझा घरी येण्याचा योग असा होता. हे असताना नाहीच जमलं यायला. दोघींचे डोळे भरून आले. पाटावर पडलेलं डोळ्यातलं पाणी पदराच्या टोकाला पुसत निवडलेले तांदूळ डब्यात भरले. हे गेले म्हणून भूक लागायची थांबत नाही ना. अन्नमय कोश. खायला हवंच. शेजारी किती दिवस करतील. मग एक दिवस केली सुरवात. रात्री सोबत म्हणून शेजारची यायची. तिलाही म्हणाले मी झोपेन एकटी. लागलं तर तुम्ही आहातच. तीन रात्री नुसती पडून होते. झोप नाहीच लागली. चार दिवशी जरावेळ लागली. आता इतकी सवय झाली की यांच्या आजारपणात झालेल्या जागरणाची कसर पूर्ण करून घेतल्यागत मेल्यासारखी झोपते. मी त्यांचं ऐकत ऐकत घर बघून घेतलं. बाहेरची खोली कागदपत्रांनी आणि पुस्तकांनी भरलेली होती. जुनं समान होतं. लोखंडी कॉट होती. आरामखुर्ची उभी करून ठेवली होती. डोक्याकडचा कापडाचा भाग तेलकट काळा दिसत होता.
काकूंच्या मागोमाग तांदुळाचा डबा घेऊन आत गेले. स्वयंपाकघरात जुनी पितळेची भांडी आणि डबे गुमसुम दिसत होते. अनेक प्लास्टिकच्या छोट्या डब्या होत्या. एक वेगळाच मेथीचा वास येतो तसा वास येत होता. मला का कोण जाणे काकूंकडे चांगलं चार दिवस राहून साफसफाई करावीशी वाटत होती. स्वयंपाकघराने मोकळा श्वास घ्यावा असं वाटत होतं. जसं काही माझे विचार काकुना ऐकायला आल्यागत त्या म्हणाल्या आयुष्यभर यांची सावली होते. यांच्या आवडी निवडी पुरवणं हे माझं आवडीचं काम होतं. अगदी त्याच्या खाण्यापिण्या पासून ते वाचनापर्यंत सगळं त्यांच्या मनासारखं करण्यात माझा जन्म गेला गं. आता हे पसरलेलं घर मला आवरावंसंच वाटत नाही. या सगळ्यात त्यांच्या आठवणी आहेत. ही सुपारीची डबी, यात लिमलेटच्या गोळ्या असत असं एकेक डबा मला त्या दाखवत होत्या. मला भडभडून आलं. मी रडून घेतलं. त्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या असंच असतं बाई. अहेवपणी मरण आलं असतं तर हवं होतं गं. पण मग विचार करते की साधा चहा पण नीट करता यायचा नाही यांना. मी आधी गेले असते तर त्याचे हाल हाल झाले असते. माझाही जीव घुटमळला असता. तसं वृद्धाश्रम हा पर्याय होता पण हे आवरलं कोणी असतं? आता शांत हो. मला हातात कसलीशी बाटली देत म्हणाल्या हे मी घरी केलेलं तेल आहे. हे घेऊन जा. नहायच्या आधी केसांना नीट लाव. इतकं बोलताना त्यांचा आवाज कितीतरी वेळा कापला. मी कानात प्राण गोळा करून सगळं ऐकत होते. तास सव्वा तास बसून त्यांचा निरोप घेतला. नमस्कारासाठी खाली वाकले तर जुनं जातं मला बघत होतं. “जन्मसावित्री हो” असं म्हणल्या त्या. खाली उतरले आणि वर बघितलं तर त्या हात हलवत गॅलरीत उभ्या होत्या. पुन्हा ये असं काहीसं म्हणाल्या. मी अंदाज घेत हो म्हणाले.
काही दिवसांनी काकू लायब्ररीत आल्या. त्यांचं गोरेपण कोमेजल्यागत वाटत होतं. मला एक फोटो दाखवत म्हणाल्या कृष्णकमळाची एका वेळेस बारा फुलं आली. ती घेऊन सुरेखा फोटो स्टुडियोत गेले त्यांच्या सोबत हा फोटो काढला. हा फोटो अजूनही माझ्याकडे आहे. पण सध्या आंधळं नक्षत्र लागल्याने तो मला सापडत नाहीये. नंतर काकू जास्त दिवस राहिल्याच नाहीत. एका अर्थी बरंच झालं असं वाटलं.
जन्मसावित्री हो असा आशीर्वाद मी परवा बऱ्याच वर्षांनी ऐकला आणि काकूच आठवल्या. आणि हो, तो तेलाचा वासही आठवला.


बास..बाकी काही नाही.

Thursday 3 May 2018

लेह, लडाख, पेंगॉंग त्सो

‘’जुले…जुले’’..म्हणजे नमस्कार. आमच्या भ्रमंतीचा शेवट होता ‘पेंगॉंग त्सो’. त्सो म्हणजे लेक. या लेकला थ्री इडियट्स मधे बघितलं होतं. याचं पाणी खारट आहे हेही माहित होतं. याच्या काठी रहायचंय ही कल्पनाही मला फारच रोमँटिक वाटली होती. 


आम्ही हळूहळू पेंगॉंग त्सो च्या दिशेने जात होतो. वाटेत अनेक वळणावळणाचे डोंगर पार करत होतो. लहानपणी गोष्टी वाचल्याचं आठवतंय की ‘’ दूर देशी एक राजा होऊन गेला. तो सात डोंगर, सात नद्या, सात समुद्र पार केल्यावर त्याच्या नगरी आपण पोचतो. इथे बाकी काही नाही पण सात डोंगर पालथे घातले. वाटायचं, आता सपाट रस्ता येईल, आणि तो यायचाही. पण एक वळण घेतलं की पुन्हा डोंगर चढायला सुरवात. वाटेत अनेक स्वच्छ पाण्याचे ओहळ तुकड्या तुकड्याने रस्ता धुवत होते. मैलोन् मैल रस्त्यात एखाद दुसरी प्रवासी गाडी नाही तर आर्मीचा ट्रक दिसे. रस्त्यात माणसं नाहीच दिसली. खुप पुढे गेल्यावर 20/25 माणसं रस्ता दुरुस्तीचं काम करत होती. नुकतेच चार दिवसांपूर्वी उजव्या बाजूच्या डोंगरावरुन काही दगड, माती, धोंडे आणि पाणी बागडत खाली आले आणि ‘इथे’ रस्ता होता याची खूण मिटवून गेले होते. आता ही रस्त्यावर गच्च बसलेली माती, दगड बाजूला करणे म्हणजे प्रचंड वेळखाऊ काम. मशीन्स असली तरी बारीक सारीक कामं माणसंच करणार. इथं चार पावलं भरभर चाललं तरी आमची प्रचंड दमछाक व्हायची. पण इथल्या माणसांनी ते अवघड काम लवकरात लवकर पूर्ण केल्यानंच आमच्या सारख्या प्रवाश्यांना पुढे जाता आलं. 
आणि अखेर लांबून ‘पेंगॉंग त्सो’ चा त्रिकोणी तुकडा दिसलाच. जसजसं पुढे गेलो तसतसं लेकची व्याप्ती किती मोठी आहे ते दिसलं. आमची टेंपो ट्रॅव्हलर अनेक दगड धोंडे तुडवत पुढे जात होती. आम्ही सीटला, पाल भितींला चिकटते तसे चिकटून तसे घट्ट बसायचा प्रयत्न करत होतो. काही वेळा हळकुंडाला बंद डब्यात घालून हलवल्यावर त्याला जसं वाटेल तसंच आम्हाला वाटत होतं. आणि अखेर आम्ही ‘पेंगॉंग त्सो’ ला पोचलोच.
इथे माझं प्रवास वर्णन संपून निरिक्षण + विचार मंथन सुरु झालं. 
1. मी महाराष्ट्रात जे काही गड किल्ले बघितले ते मला जास्त बोलके वाटले.
2. सह्याद्री म्हणे 65 दशलक्ष वर्ष जुना आहे आणि हिमालय 50. म्हणजे सह्याद्री हा हिमालयाचा काका नाही तर दादा आहे. सह्याद्री कणखर आहे. आणि हे डोंगर मला कधी हळवे तर कधी रागीट वाटले. असं म्हणायला हरकत नाही.
3. मी ही जी काही भ्रमंती केली तो भाग आपलाच आहे. पण कदाचित माझं अर्ध आयुष्य महाराष्ट्रात गेल्यानं असेल म्हणा मला ते उघडे डोंगर अंगावर आल्यासारखे वाटत होते. 
4. ‘पेंगॉंग त्सो’ आहे खुप छान. प्रश्नच नाही. पण तरीही कुठेतरी कमतरता वाटत असल्या सारखं वाटलं. लेक जवळून बघताना या लेकपाशी मला शांत रम्य तळ्याकाठी बसल्यासारखं वाटत नव्हतं. तिथे एक गूढ शांतता होती. पुन्हा एकदा मला ‘’अचपळ मन माझे नावरे आवरिता’’ ओळ आठवली.
5. प्रवास सुरु करायच्या आधी जिथे जाणार तिकडची भौगोलिक परिस्थिती समजाऊन घ्यायलाच हवी. आम्ही ती समजाऊन घेतली तरी ‘कळतंय पण वळत नाही ‘’ असं काही वेळा होत होतं. 
6. प्रवासात वळणा वळणावर ‘’गाडी सावकाश, जपून चालवावी’’ या आशायाचे वाचनीय बोर्ड आहेत. मला काहींचे फोटो घेता आले. तर काही पटकन लिहून घेत होते. पण गाडी वळणं घेत असल्याने अक्षरही इतकं वळणदार आलं की नंतर वाचू म्हणता आपलंच अक्षर वाचता येईना.
7. इकडची माणसं कायम हसतमुख. ‘’मॅडमजी’’ आणि ‘’जी मॅडमजी’’ शिवाय वाक्याची सुरवात, शेवट होत नसे. 
8. ‘सोनम’ हे नाव तिकडे आवडतं आहे.
आपल्या भारतीय सेनेला त्रिवार मानाचा मुजरा. सगळे जुग जुग जियो रे. 
जाता जाता मैत्रीचा सल्ला.
शक्यतो हा भाग पन्नाशीच्या आत बघा. तर जास्त एन्जॉय कराल. मला इथे परत जायला आवडेल. पण ते थंडीला सुरवात होताना. बघू केव्हा योग येतो ते.
पण इथे जाल तर तिकडचंच एक वाक्य कायम लक्षात ठेवा.
‘’Don’t be a gama in the land of lamas’’


लेह, लडाख, मॉनेस्ट्री, तुरतूक (turtuk) -२


लेह लद्दाख हा आपला भारताचाच भाग. सहज मनात आलं, कोणताही मनुष्य प्राणी आपल्या शरीरावर , स्वतःवर एकसारखंच प्रेम करतो. म्हणजे मला माझे पाय आवडत नाहीत म्हणून मी त्याच्याकडे दुर्लक्ष करते किंवा माझे केस कुरळे आहेत म्हणून मला आवडत नाहीत असं तर होत नाही ना. तशाच काहीशा भावना मला या लेह, लद्दाख आणि आम्ही ज्या ज्या भागात फिरलो त्याबद्दल वाटलं. मला इथल्या कधी न पाहिलेल्या माणसांबद्दल आपलेपणा वाटत होता. इतकं अदबशीर बोलणं, हसतमुख चेहेरे बघून मन सूर्यफुलासारखं फुलून जात होतं. मी भारतात तशी फारशी फिरले नाहीये खरं तर. पण हा माझाच देश. मग मला त्याचे कानेकोपरे माहीत असायलाच हवेत. आणि मला ते आपलेसे वाटले. इथे मला जे म्हणायचंय ते थोडक्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केलाय. 

आम्ही लामायुरुतली मॉनेस्ट्री बघितली. त्याच धर्तीच्या अनेक मॉनेस्ट्री बघितल्या. शांत, गंभीर वातावरण होतं सगळीकडे. मला अशा शांत ठिकाणी गेलं की रामदासांचं करुणाष्टक आठवतं. आता पाठ नसलं तरी त्यातली ‘’अचपळ मन माझे नावरे आवरिता ‘’ ही ओळ मात्र हटकून आठवते. याचं कारण मला कळलेलं नाही. 

आमच्या या ठिकाणाहून त्या ठिकाणी जाण्याच्या अव्याहत प्रवासात मुंबईत फारसे बघायला न मिळणारे भारतीय सेनेतले स्मार्ट, तरतरीत, जवान बघायला मिळाले. भारतीय सेनेचे ते ‘मिलिट्री ग्रीन’ रंगाचे ते ट्रक्स, जिप्सीतून जाणारे सेनेचे अधिकारी मी काहीवेळा हळूच तर काहीवेळा गॉगल लावला असल्याने एकटक बघत होते. असो. या मोठ्या प्रवासात एक दिवस तुरतुक साठी राखून ठेवला होता. यु पीन सारखे रस्ते, अगदी शेजारुन वहाणारी श्योक नदी. ही नदी आपल्याबरोबर खुप माती, वाहून नेत असल्याने तिचं पाणी काळसर, चिखल मिसळल्यासारखं वाटत होतं. काही दिवसांनी पाणी संथावलं की म्हणे हिचं पाणीही निळसार झाक असलेलं दिसतं. 

खारदुंग ला खिंडीत जाण्याचा रस्ता, तसंच जवळपासचे जे काही रस्ते बनवलेत त्याला तोड नाही. हे रस्ते बनवण्याचं श्रेय ब्रिगेडियर वोंबतकेरे यांना जातं. इकडे निसर्गाचं केव्हा बिनसेल ते सांगता येत नाही. बिनसलं असो की नसो. मनात आलं की येतात मोठमोठे दगड बागडत खाली. आपण आपला जीव चिमटीतच पकडलेला असतो. मूठ फार मोठी वाटते. तरीही इथे वहानांचा अव्याहत प्रवाह चालू असतो. पण दिवसाच. कारण ऊन जसजसं चढेल तसतसं कुठून ओहोळ वहात येतील आणि आपल्याबरोबर सोबत किती आणि कश्या दगडधोंड्याना घेऊन येईल याचा नेम नसतो. 

आम्ही तुरतुकला पोचलो. हे छोटसं गाव पाकिस्तानच्या ताब्यातून आपण 1970 ला घेतलं. पाकिस्तानी सीमेपासून फक्त सात किमी अंतरावर. इथे लोकं बल्ति भाषा बोलतात. चारही बाजून उंचच उंच डोंगर आणि मधे आमचं रहाण्याचं ठिकाण. बांधकाम सुरु असलेल्या हॉटेल तुरतुक मधे पाऊल टाकल्याबरोबर मोठ्या ताटात ओले, सुके जरदाळू ठेवले होते. एकाने ताज्या जरदाळूचा जुस दिला. त्याची चव अमृततुल्य होती. आम्ही दमलेले एका दमात ते अमृत पोटात टाकलं. मुन्नाभाई MBBS मधे मुन्ना म्हणतो ना की ‘’इसको एक बोतल ग्लुकोज चढाना’’ तसंच आम्हाला झालं. या पेयाची चव बराच वेळ जिभेवर रेंगाळत रहाते. आता तरतरीत झुरळं होऊन जो तो आपापला रहाण्याचा तंबू बघायला लागला. सगळ्या सुविधांनी युक्त असा तो तंबू आणि आजुबाजूची फुलं, हिरवाई बघून मी मनोमन भारतीय सेनेला दुवा दिला. इतकी सुंदर जागा, लोकं,मुलं, बाळं केवळ यांच्यामुळे बघायला मिळाली. 
इथे एक राजा आहे. त्याच्या महालाची पाक आर्मीने पार दुर्दशा करुन टाकली आहे. त्याचं नाव YBGO MOHD KHAN KACHO. आदल्या दिवशी छानसा डगला घालून आल्याने मला तो स्मार्ट वाटला. दुसर्या दिवशी त्यांच्या महालात गेले तर पार रया गेलेल्या अवस्थेत दिसला. गतकाळच्या वैभवाच्या खुणा बघितल्या. सोबत माहिती देणारा जेव्हा पाकिस्तान आर्मीचा उल्लेख करत असे तेव्हा मी या राजाच्या चेहेर्यावरचे भाव बघत असे. काहीही असो. गावची सगळी मंडळी खुश दिसली. मला तिकडे एक लायब्ररी पण दिसली. तीनशे पुस्तकं आहेत तिकडे. 
इथे दोन घरांच्यामधून स्वच्छ पाण्याचे ओहळ वहातात. त्यात मुलं/मुली आपले केस धुतात. आपली डोकी त्या ओहळाच्या पाण्यात भिजवायची. साबण लावायचा. पुन्हा ओहोळात आपलं डोकं खळबळायचं. मजाच वाटली. रोज अंघोळ करत नाहीत ते.

लेह..लद्दाख (लडाख)- १


दहा दिवस घरच्यांपासून लांब गेले होते. अगदी वरच्या टोकाला. लेह लडाख (लद्दाख) ला. खरं तर पाय बोबडं का होईना पण बोलत होते. काश्मीरची एकूण परिस्थिती बघता पोटात बाकबूक होत होतं. पण एकदा ठरवलं की ठरवलं या ठाम विचारामुळे माझा बोजा घेऊन इतर दहा जणांबरोबर मीही प्रवाहात स्वतःला झोकून दिलं. सोमवारी श्रीनगरला सकाळी ११ वाजता उतरलो. याआधी हा भाग मी बघितला नसल्याने विमानातूनच सुरवातीला बघायला सुरवात केली. सिनेमातली काही चित्र डोळ्यासमोर होती. वरून तरी छान हिरवं गार दिसत होतं. अलगद खाली उतरलो. बाहेरचं तापमान २९ होतं. ‘किती साठवू दोन डोळ्यांनी’ अशी माझी अवस्था झाली होती. 
बस मधे बसलो. चक्रधारी बोलता बोलता म्हणाला. ‘’आज २८ दिन हो गये बंद को. ये अभी ५ अगस्त तक ऐसेही रहेगा’’ आपल्याला जोडून तीन दिवस आलेली सुट्टी सुखावून जाते. आणि आपण प्लॅन्स आखायला लागतो. सगळीकडचा शुकशुकाट बघून पोटात खड्डा पडला. हॉटेलवर गेलो. तिकडचा स्टाफ आनंदात दिसला. या बंद मुळे आणि आधी घडलेल्या काही भीतीदायक कारणांनी पर्यटकांनी श्रीनगरला लांब वळसा घातल्यानं हाता तोंडातला घास हिरावला गेला होता ना. आम्ही आलो तेवढीच हॉटेलमधे चहल पहल. 
संध्याकाळी हॉटेलच्या समोरच्या गल्लीतून बाहेर पडल्यावर समोर बघितलं तर दल सरोवर. त्यातले छोटे छोटे शिकारे बघताना मला ‘जब जब फुल खिले’ मधला ‘’परदेसियोंसे न अखियाँ मिलाना’’ म्हणणारा शशी कपूर आठवला. तर कोणाला ‘काश्मीर की कली’ आठवला. ‘’तासाभरासाठी शिकाऱ्यात बसा. मीना बाजार पर्यंत फिरवून आणतो. ५० रुपये घेईन’’ या बोलीवर डुगडूगत एका शिकार्यात चार जण असे बसलो. एके काळी या सरोवराचं रूप किती देखणं असेल याची जागोजागी खुण पटत होती. हर हायनेस गायत्री देवी म्हातार्या झाल्या तरी सुध्दा सुंदर दिसायच्या, तसंच काहीसं या सरोवराबद्द्ल वाटून गेलं. आपण मात्र कधीही न सुधारण्याच्या कॅटेगरीतलेच. जाऊ तिथे खाऊन आपल्या खुणा ठेवणारे. पाण्यात पाण वनस्पतींशिवाय रिकाम्या कोकच्या, इतर पेयांच्या बाटल्या, लेज, कुरकुरेची पाकीटं तरंगत होती. पाण्यातून सैर करताना डाव्या आणि उजव्या बाजूने विक्रेते अजिजी करत काही वस्तू घ्यायला सांगतात. कोणी ‘’कश्मीरी वेशात फोटो काढून घ्या’’ असं म्हणत हातात फुलांचा गुच्छ देऊ पाहत. या सगळ्यातून वाट काढत काही बारीक सारीक खरेदी करत आम्ही परत हॉटेलवर गेलो. 
यापुढे आम्ही कसे आणि कुठे गेलो ते फार लांबण लावत बसणार नाही. मला कुठे काय वाटलं हे माझं मत सांगणार आहे. 
आम्ही विवेक नागवेकर यांच्या बरोबर गेलो होतो. ते १९८५ पासून ‘लेहवासी’ झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या मते ते लेहच्या प्रेमात नसून लेह त्यांच्या प्रेमात आहेत. आणि हे खरंही आहे. 
श्रीनगरहून आम्ही सोनमर्ग ला गेलो. तिथून जोझीला पास करून बाल्तर ...अमरनाथ परिसर करत घुमरी, कारगिल स्मारक बघून कारगिलला मुक्काम केलं. त्याच दिवशी आम्ही पूर्वी ‘तिकडच्या’ ताब्यात असलेला आणि आता ‘आपला’ असलेला HUNDERMAN चा भाग आणि आपली पोस्ट बघायला गेलो. खरं तर प्रवास आणि जेवण अंगावर आलं होतं. पण ही संधी कोण सोडेल बाबा? सगळे पोस्ट बघून, सेनेतल्या सावळ्या, उंच, स्मार्ट सैनिकाशी बोलून तरतरीत होऊन हॉटेलवर परतलो. 
दुसऱ्या दिवशी सकाळी निघून मुलबेकला डोंगरात कोरलेला बुद्ध बघितला. इथून पुढे जाताना ‘मूनलँड’ ला गेलो. हा परिसर म्हणजे चंद्राचा पृष्ठभाग असावा तसा आहे. हा भाग बघायला गेलेल्या पर्यटकांनी तिकडे कचरा टाकला आहे. मला सगळ्यात आधी तोच डोळ्यात खुपला.